माझ्या सर्व प्रिय महाराष्ट्रीय मातांनो, भगिनिंनो आणि बांधवानो,
माझं हे पत्र आपणापर्यंत पोचेल तेंव्हा लोकसभा निवडणूकांचं मतदान तोंडावर येऊन पोहोचलेलं असेल. मी सुरुवातीला संबोधताना माझ्या सर्व प्रिय महाराष्ट्रीय बांधवाना साद घातली त्याचा अर्थ थोडा व्यापक आहे, जे मराठी आई वडीलांच्या पोटी जन्माला आले ते तर मराठीच परंतु जे महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या स्थायिक असणारे, मराठी भाषा शिकणारे, तिच्यावर प्रेम करणारे, तिचा अभिमान बाळगणारे असे सर्वचजण महाराष्ट्रीय आहेत असे मी मानतो. फरंतु आपल्या प्रदेशाचा विकास हा भकास करुन तिथले लाखोंचे लोंढे महाराष्ट्रात सोडून महाराष्ट्रातल्या मूळ मराठी माणसाला व सहिष्णू मराठी संस्कृतीला आपल्या दादागिरीने चिरडू पहाणार्या प्रदेशातल्या नेत्यांना व त्यांच्या प्रदेशातून इथे बेकायदेशीरपणे राजकीय व प्रशासनिक दादागिरी करणार्यांना माझा विरोध आहे आणि विरोधच राहील.
आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर तुमच्याकडे मतं मागायला शिवसेना, भा.ज.पा, राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेसचे उमेदवार येतील. महाराष्ट्रातून यांचेच सर्व खासदार लोकसभेत व राज्यसभेत आजवर तुम्ही पाठवलेत. मराठी अस्मितेच्या बाजूने, महाराष्ट्राच्या बाजूने किंवा महाराष्ट्रावर केंद्राकडून अन्याय होत असताना यांच्यातले किती जणं महाराष्ट्र प्रेमाने संसदेमध्ये चवताळून उभे राहिले? हे सगळे पक्ष कणाहिन, लाचार, दांभिक व शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्माला लाज आणणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांना पंतप्रधान व्हायची स्वप्नं पडायला लागली की, आपण मराठी आहोत हे सुचतं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी पाट्या, मराठी भाषा, महाराष्ट्र धर्मासाठीचं आंदोलन करणार्या माझ्या कोवळ्या कार्यकर्त्यांवर यांच्याच हातातल्या गृहखात्याने महाराष्ट्रात पाशवी अन्याय व अत्याचार केलेला असतो. मराठी माणूस मत देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा जाब मतांद्वारे विचारणार आहे की नाही?
दुसरीकडे शिवसेना-भा.ज.पा. बद्दल तर काय बोलणार? त्यांच्यातली दांभिकता बघून खुद्द बिहारी नेतेही हादरतील. मुंबई महानगरपालिकेत हिंदी भाषेच्या ठरावाला आम्ही विरोध केला, भोजपूरी चित्रपटांना सवलती देण्याच्या ठरावाविरुध्द आम्ही आवाज काढला आणि तो ठराव रद्द करुन घेतला हे आपण विसरणार आहात का? शिवसेनेनेच महाराष्ट्राच्या छाताडावर अस्तित्वातच नसलेला उत्तर प्रदेश दिन नाचवला. छठपूजा महाराष्ट्रात शिवसेनेनेच सुरु केली. एकीकडे बिरहा, भोजपूरी गीत गायन, लाई-चना संमेलन असं सांगत दुसरीकडे 'आम्हीच मराठी' असा पूकारा करणार्या शिवसेनेला त्यांच्या राज्यात साध्या दुकानांवरच्या पाट्या मराठी का होत नव्हत्या? माझ्या मुलांनी घनघोर आंदोलन करुन त्या करुन घेतल्या हे मराठीजन विसरणार आहेत काय? हे त्यांचं मराठी प्रेम पुतनामावशींच आहे. भा.ज.पा. महाराष्ट्रात मराठी अस्मितेवर लाथ मारतो. पण कर्नाटकात त्यांचाच मुख्यमंत्री येडीयुरप्पा कानडी अस्मिता दाखवून बेळगावात माझ्या मराठी माणसांना चिरडतो. तेंव्हा मराठी भा.ज.पा. नेत्यांना तुम्ही महाराष्ट्रीय म्हणून कसं मतदान करु शकणार? हे मोठ्या हिंदुत्वाच्या बाता मारुन देश तोडायला बघतात. अफझलगुरुचं नाव घेऊन मतं मागतात. पण त्याच अफझलगुरुच्या बाजूने लढणार्या वकील राम जेठमलानींचा मुलगा महेश जेठमलानी भा.ज.पा.चे लोकसभा उमेदवार आहेत.
जे जे देशद्रोही त्या त्या समाजविघातक काम करणार्या लोकांच्या केसेस हे जेठमलानी बाप-बेटे घेत आले. मग ती स्वर्गीय इंदिरा गांधींच्या मारेकर्याची केस असो, लालूप्रसाद यादवांच्या चारा घोटाळ्याची केस असो वा जेसिका लालच्या खुन्यांची केस असो. जे जे वाईट त्यांच्या केसेस हे घेत आले आणि भा.ज.पा.-शिवसेनेच्या पाठिंब्यावरती हेच जेठमलानी खासदार म्हणून संसदेत गेले. ही माणसं किती खोटी अन् किती दांभिक असावीत? खरंतर तुमच्याकडे मतं मागायला येताना यांना तोंड दाखवायची लाज वाटायला पाहिजे. हे केवळ मराठी माणसांनाच नव्हे तर महाराष्ट्रावर प्रेम करणार्या प्रत्येकाला फसवताहेत.
काँग्रेस तर या सर्व पापांचं उगमस्थान आहे. १०६ हुतात्मे देऊन मोरारजी, जवाहरलाल नेहरु सारख्यांकडून मुंबई मराठी माणसाने मिळवली. त्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजधानीचा काँग्रेसचा अध्यक्ष कोण? तर कृपाशंकर सिंह! यांचे उमेदवार पहा. जणू काही मराठी माणूस महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही. लालुप्रसाद यादव सोनियाजींची महाराष्ट्राबाबत ट्युशन घेणार आणि मग महाराष्ट्राबाबत काँग्रेसचं दिल्लीत धोरण ठरणार. इथल्या महाराष्ट्र काँग्रेसचे कणाहीन लाचार मराठी पुढारी औरंगजेबाच्या दरबारात बादशहाची थुंकी झेलायला जाणार्या मराठा जहागीरदार, वतनदारांप्रमाणे धाव घेणार आणि मग महाराष्ट्राच्या उरावर अजून एक घाव यू.पी.-बिहारी नेते घालणार !
या चारही पक्षांच्या घावांनी रक्तबंबाळ होऊनही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसांसाठी लढायला सज्ज आहे. लोकसभेसाठी मी ताठ मराठी कण्याचे बारा उमेदवार उभे केलेले आहेत. ते जर लोकसभेत गेले तर संसदेमध्ये मूक झालेला मराठी आवाज पुन्हा डरकाळ्या फोडू लागेल. आज माझा पक्ष लहान आहे. एक दिवस मी अठ्ठेचाळीसही खासदार माझ्याच पक्षाचे लोकसभेत पाठवेन आणि दिल्लीला महाराष्ट्राच्या तलवारीचं पाणी काय असतं ते दाखवून देईन. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. इतर मराठी पक्षच आमच्या उरावर बसलेत नि त्यात धनाच्या कमतरतेची भर, म्हणून माझा पक्ष मर्यादित जागा लढवतो आहे. जागा आम्ही लढवतो आहोत, पण हे युध्द तुमचं आणि तुमच्यासाठी आहे हे लक्षात असू द्या.
इथे मी दोन गोष्टी स्पष्ट करु इच्छितो. पहिलं म्हणजे, मी आर्थिक व तत्सम इतर बाबींवर बोलत नाही असा मुद्दा काढला जातो. उत्तर प्रदेश व बिहारचा विकास करण्याकरता महाराष्ट्र व मुंबई भरभरुन कर देतं त्याचा थोडासा वाटा महाराष्ट्राला येतो. बाकी उत्तर प्रदेश व बिहारलाच जास्तीचा वाटा जातो. तिथले नेते पैशाने गब्बर, माफीया होतात. तर जनता भकास, भिकारी, नि उदास. मग रेल्वे भरभरुन त्यांचे लक्षावधींचे लोंढे महाराष्ट्रात शिरतात. बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या मतदार यादीत आपली नावं घालतात. मग मागाहून ते प्रदेश भिकेला लावून महाराष्ट्रातलं राजकारण करायला व इथे राजकीय दादागिरी करायला त्यांचे नेते येतात. त्यांना आपलेच इथले इतर पक्षांचे मराठी नेते साथ देतात, यालाच माझा विरोध आहे. त्याविरुध्द माझा पक्ष लढतोय्. हा प्रश्न मुलत: आर्थिकच आहे. पण माझ्या पक्षाकडे सत्ता नसल्याने मी रस्त्यावर लढतो आहे. सत्ता आली की या लढयाचं आर्थिक तोंडही मी उघडेन आणि महाराष्ट्राला या दुहेरी मुस्कटदाबीतून मुक्त करेन.
भारतातल्या यु.पी.-बिहार व्यतिरीक्त कोणत्याही प्रदेशातून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोंढे राजकीय दादागिरी करायला येत नाहीत. इतर प्रांतातून येणारे भारतीय परप्रांतीय (उत्तरेतलेही) महाराष्ट्रावर व महाराष्ट्र धर्मावर बहुतांशी प्रेमच करतात. त्यांचा माझा पक्ष आदरच करतो. मिडियाने खोटेपणा करुन माझी लढाई या सर्व परप्रांतीयांशी आहे असा प्रचार चालवलेला आहे तो एक धुर्त कावा आहे. त्याचाही बंदोबस्त लवकरच होईल.
वर्षानुवर्षे आपल्या समोर येणार्या या ढोंगी राजकीय पुढार्यांना आणि उमेदवारांना आपणच पाठिंबा देतो आणि मग ते राजकारणाचं स्वत:च्या व्यवसायात रुपांतर करतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६० वर्ष हेच चालू आहे. यात आता तरी आपण बदल करणार आहोत की नाही ? दरवेळी त्याच त्याच नाकर्त्या पक्षांच्या लोकांना खासदार करायचे आणि पुढची पाच वर्ष त आपल्यासाठी काहीच करत नाही म्हणून पश्चातापाचा हात कपाळावरती मारत रहायचा. हे किती वर्ष चालणार ?
माझ्या तमाम मराठी मातांनो, बांधवानो, आणि भगिनिंनो, या लोकसभेला आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकीत जर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत दिलंत, तर मी महाराष्ट्र युरोपमधल्या कुठल्याही देशापेक्षा अधिक समृध्द करुन तुम्हाला दाखवीन. लक्षात ठेवा, सुट्टी आहे म्हणून आत्ताच गावाला जाऊ नका. मतदान करा. तुमच्या मताने महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार आहे. तुमच्या मताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाट पहात आहे.
उठ, महाराष्ट्रा बाहेर पड, पुन्हा एकदा दिल्लीला महाराष्ट्राचं पाणी पाजून राष्ट्रधर्म व महाराष्ट्र धर्म शिकवण्याची वेळ आलेली आहे.
संसदेत, 'तुम्हा मराठी जणांना अरबी समुद्राचे पाणी पिऊन यांचे मेंदु सडलेत' असं एक बिहारी खासदार प्रभुनाथ सिंह म्हणाला होता हे विसरु नका. तेंव्हा हा राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्तेच चवताळुन महाराष्ट्रासाठी उभे राहिले. त्यावेळी तुमचे शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, उध्दव ठाकरे, लालकृष्ण अडवाणी हे मराठी माणसाच्या वस्त्रहरणाची मजा घेत होते. माझी सुरक्षा काढून घेतली. माझ्या कार्यकर्त्यांना बिहारी व यू.पी.च्या अधिकार्यांनी अमानुष मारहाण केली. माझ्या मालेगावच्या कार्यकर्त्यांना तर निखिल गुप्ता नावाच्या एस.पी.ने मराठीची बाजू घेतात म्हणून दोन-दोनदा ठाण्यावर बोलावून बेदम मारलंय् हे सारं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहखात्याच्या आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने होत होतं. भा.ज.पा.-शिवसेनेचे संसदेतले खासदार तेंव्हा हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून हे मराठी वस्त्रहरण निमुटपणे पहात होते. मी आणि माझा पक्ष सत्ता नसल्याने त्यावेळेला रस्त्यावर लढत होतो, हे मतदानाच्या दिवशी विसरु नका !
शेवटी एकच ! महाराष्ट्रावर जो प्रेम करतो महाराष्ट्रासाठी जो मरायला तयार आहे तो मराठी. यात सगळे येतात. पण काहीजण निश्चितच येत नाहीत. चार प्रमुख पक्ष यात येत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका काँग्रेसी उमेदवाराकडून पराभूत झाल्याचा इतिहास आपल्याला माहीत असेलच. त्यामुळे मराठी माणसाला कुटीलतेने आपापसात झुंजवून त्याचं क्षात्रतेज (छत्रपती शिवरायांसारखं!) दिल्लीत पोचणार नाही याची दक्षता दिल्ली घेते. तेंव्हा सावध रहा. उठा. जागे व्हा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वत्र, सर्व निवडणुकांमध्ये निर्विवाद विजय होऊन महाराष्ट्र धर्माचा विराट असा वणवा पेटवेपर्यंत थांबू नका. मी माझ्या उमेदवारासाठी तुमचं एक मत त्यासाठीच मागतोय्. ते द्याल ना? नव्हे, द्याच! कारण ते मत तुमचं अंत:करणापासून दिलेलं मत असेल.
तूर्त एवढंच.
जय महाराष्ट्र!
आपला नम्र,
( राज ठाकरे )